– जंतर-मंतर ते संविधान चौक… 36 दिवसांच्या संघर्षानंतर विद्यार्थ्यांच्या आवाजाची केंद्र सरकारकडून दखल
– ‘युवा शक्ती हीच देशाची खरी ताकद’ — लोकशाही आंदोलनाचा मोठा परिणाम
The Exposer
नागपूर : देशातील शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा, या मागणीसाठी दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी व युवकांनी सलग 36 दिवस संविधानिक मार्गाने आंदोलन केले. या आंदोलनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. नागपूरच्या संविधान चौकासह अनेक शहरांमध्ये विद्यार्थी, युवक आणि पालक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. शेवटी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रधान यांनी राजीनामा सोपवीला. या आंदोलनादरम्यान दिल्लीत आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर देशभरात संतापाची लाट उसळली. त्यानंतर शिक्षण व्यवस्था, नीट परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न राष्ट्रीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले. विविध राज्यांतील युवकांनी एकजूट दाखवत आंदोलन अधिक व्यापक केले.
या संघर्षामुळे शिक्षण व्यवस्थेतील पारदर्शकता, परीक्षा प्रक्रियेतील विश्वासार्हता आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधले गेले. देशभरातील युवकांच्या एकजुटीने लोकशाही मार्गाने उभारलेले आंदोलन प्रभावी ठरल्याची भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
या आंदोलनातून एक स्पष्ट संदेश समोर आला—संघटित, जागरूक आणि संविधानिक मार्गाने लढणारी युवा शक्ती हीच देशाच्या परिवर्तनाची खरी ताकद आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येत नाही आणि लोकशाहीत शांततापूर्ण संघर्षालाही मोठे महत्त्व असते, हे या आंदोलनाने अधोरेखित केले, हे विशेष. भगतसिंग यांचे क्रांतीचे विचार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानिक मूल्यांवर लढलेल्या आंदोलनाचे हे यश असल्याचे म्हटले जाते.
Author: संतोष तायडे
संपादक











